शेळीपालनाची सुरुवात करत असताना चांगली जातिवंत शेळीची पैदास कशी करायची, तसेच कोणती उद्दिष्ट ठेवायची हे आपण मागील लेखात शिकलो. (तो लेख आपण येथे क्लिक करून वाचू शकता – सुरुवात शेळीपालनाची)
या लेखात आपण शेळ्यांच्या आहाराचे नियोजन शिकूया.
शेळीच्या आहारातील जीवनसत्वे
शेळीच्या जीवनसत्त्वाची गरज हि त्यांचे वय, वजन, त्यांची गाभण किंव्हा व्यायालेली अवस्था, वातावरण यासारख्या घटकांवर आवलंबून असते. वेगवेगळ्या अवस्थेतील शेळ्यांची जीवनसत्त्वाची गरज पूर्णपणे वेगळी असते. जीवनसत्वांमध्ये प्रथिने, कर्बोदके, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पाणी,हे घटक येतात.
शेळीच्या आहारातील विविधता
फार पूर्वीपासून शेळीपालन करणारा शेतकरी शेळ्यांना रानात चरायला घेऊन जात आहे. अशा प्रकारच्या फिरून खाण्याच्या पद्धतीमुळे एकाच प्रकारचा चारा शेळ्यांना मिळत नाही त्या विविध प्रकारचा चारा खातात. आपणही जेव्हा बंदिस्त शेळीपालन करतो त्या वेळेस शेळीच्या आहारात विविधता ठेवणे फार महत्वाचे आहे. शेळीचे सुरुवातीचे दूध (चीक) पहिल्या एका तासात पिलांना पाजावे. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. लहान पिल्लाना प्रथिनांची व ऊर्जेची आवश्यकता जास्त असते. कोणत्याही वयोगटातल्या शेळीला चारा किव्हा खुराक देताना तिची उत्पादनातील अवस्था लक्षात घेणे गरजेचे असते. जसे लहान वयातील पिल्लाना वजनवाढीच्या खुरकाचे नियोजन करावे लागते.दूध देणाऱ्या गटातील शेळ्या व लहान पिल्ले यांची जीवनसत्त्वाची गरज खूप जास्त असते, या सर्व गोष्टींमुळे शेळीपालन करताना आहाराचे व्यवस्थापन फार महत्वाचे आहे.
चारा बदल करतानाची काळजी
चारा बदल करताना लक्षात ठेवा-
- चाऱ्यातील बदल हा अचानकपणे करू नये. चारा सावकाश बदलावा.
- नवीन चारा चालू करताना 20 ते 25 टक्के नवीन चारा व 75 टक्के जुना चारा याप्रमाणे चाऱ्याचे प्रमाण हळू हळू वाढवत जावे. पोटातील उपयुक्त जिवाणूंना हा बदल स्वीकारण्यास वेळ लागतो.
- चाऱ्याची रोजची वेळ कधीच बदलू नये. व चाऱ्यामध्ये विविधता असावी.
शेळ्यांचा आहाराची उद्दिष्ट
उत्पादन – वजनवाढ
दूध
गाभनावस्था
पैदास
शेळ्यांची ऊर्जेची गरज हि कर्बोदके व फॅट यातून भागवली जाते. मिनरल्स हि शारीरिक प्रक्रियांसाठी फार महत्वाची असतात. वजनवाढी साठी व दुधउत्पादनासाठी लागणारी कॅलशिअम सारख्या मिनरल्स ची मात्रा पण वेगळी असू शकते.
शेळ्यांना द्यावयाच्या आहारामध्ये हिरवा चारा, सुका चारा, व खुराक असे चाऱ्याचे वर्गीकरण होते. व यातूनच सर्व महत्वाची जीवनसत्वे दिली जातात. एकूण आहारामधील कोरडा भाग (ड्राय मॅटर) हा खूप महत्वाचा असतो. चाऱ्यामधील सर्व पाणी काढून घेतल्यानंतर राहिलेल्या भागाला कोरडा भाग असे म्हंटले जाते. जीवनसत्व हि कोरड्या भागात साठवलेली असतात. या कोरड्या भागाचे प्रमाण हे प्रत्येक प्रकारच्या चाऱ्या मध्ये वेगळे असते, जसा कि लुसलुशीत हिरव्या चाऱ्यामध्ये 80 ते 90 टक्के पाणी असते त्यात कोरडा भाग 10 ते 20 टक्के असतो. तर सुक्या चाऱ्यामध्ये फक्त 10 टक्के पाणी असते व कोरडा भाग जवळपास 90 टक्के असतो, शरीराच्या सर्व गरजा या चाऱ्यातील कोरड्या भागावर अवलंबून असतात. त्यानुसारच आहाराचे व्यवस्थापन करावे लागते.
शरीराच्या वेगवेगळ्या अवस्थानुसार कोरड्या भागाचे प्रमाण बदलत असते. वजनाच्या 5 ते 7 टक्के कोरडा भाग आहारात दिला जावा. परंतु काही वेळेस 3 ते 4 टक्के एवढे प्रमाणही द्यावे लागते. म्हणून आपल्या गोठ्यातील सर्व शेळ्यांचे वजन माहित असणे फार महत्वाचे आहे. गोठ्याचा आहार ठरवताना सरासरी चाऱ्याच्या गरजेचा अंदाज बांधण्यासाठी शेळ्यांचे वजन व सरासरी कोरड्या भागाचे प्रमाण माहित असणे गरजेचे आहे.
शेळ्यांना सर्वात जास्त झाडपाला या प्रकारचा चारा आवडतो. मग कोणत्या प्रकारचा झाडपाला आपण लागवड करून शेळ्यांना पुरवू शकतो हे देखील शिकणे महत्वाचे आहे. शेवरी, सुबाभूळ, दशरथ यांची लागवड बाग पद्धतीने केल्यास कायमस्वरूपी किमान एका वेळेस शेळ्यांना त्यांच्या जास्त आवडीच्या चाऱ्याचा पुरवठा करता येईल. यापैकी सुबाभूळ या चाऱ्याचे नवीन वाण देखील बाजारात उपलब्ध आहेत, ज्यात बीया नसतात. व झाडपाल्याची गुणवत्ता कोणत्याही मोसमात बदलत नाही.
पारंपरिक पद्धतीच्या चाऱ्यामध्ये मका, ज्वारी त्याचबरोबर लसूण घास ( लुसर्न) हा देखील खूप पौष्टिक आहे. हायब्रीड नेपियर, गिनी गवत , पॅरा गवत हे देखील हिरव्या चाऱ्याचे चांगले स्रोत आहेत.
सुका चारा म्हणून मका व ज्वारीचा कडबा , सोयाबीनचे भुसकाट, किंवा प्रक्रिया केलेला इतर सुका चारा वापरता येतो.
मुरघास- चांगल्या प्रतीचा हिरवा चारा हवाबंद करून कमीत कमी 45 दिवस साठवून ठेवल्यास त्याचा पौष्टीक मुरघास तयार होतो व तो आपल्याला शेळ्यांसाठी वर्षभर वापरता येतो. दुष्काळी परिस्थितीत मुरघासाचा खूप चांगला उपयोग होतो. यासाठी मका या पिकाचा जास्त वापर केला जातो.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पिण्याचे पाणी. शेळ्यांना पिण्यासाठी मुबलक व स्वच्छ पाणी असले पाहिजे. बंदिस्त पद्धतीच्या गोठ्यामध्ये तहान लागल्यावर शेळ्यांना मुबलक पाणी पिता येते.
हायड्रोपॉनिक्स
या पद्धतीने मकेच्या दाण्यापासून 7 ते 9 दिवसात तयार झालेला हिरवा चारा फार लुसलुशीत असतो व शेळ्या अशा प्रकारचा चारा आवडीने खातात. दुष्काळी परिस्थितीत शेळ्यांना हिरवा चारा पुरविण्यासाठी हि पद्धत फार उपयोगी ठरते.
दिवसभराच्या वैराणीच्या नियोजनामध्ये झाडपाला,हिरवा चारा व सुका चारा यांचा व्यवस्थित नियोजन केला तर शेळ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचा चारा खाणे शक्य होईल.
शेळ्यांना खुराक देताना शक्यतो दिवसभरातून 2 वेळेस द्यावा. खुरकामध्ये शेळ्यांसाठी मिळणारे खाद्य हि उपलब्ध आहे. विशेष करून खाद्य वापरात नसलेल्या गोठ्यावर मका, सरकी , खपरी पेंड याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. शेळ्यांची पेंड असो किंवा तयार केलेला खुराक यामध्ये खनिजतत्वाचे मिश्रण टाकणे फार गरजेचे असते, शरीराच्या सर्व महत्वाच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी (खनिजतत्वे)मिनरल्स लागतात. दररोज मिनरल्स वापरल्याने शेळी वेळेवर माजावर येणे, गाभण राहण्याचे प्रमाण वाढणे, वजन वाढीस मदद होणे, त्वचा चमकदार राहणे, असे वेगवेगळे फायदे होतात.
आपण देत असलेला आहार हा सर्व जीवनसत्त्वांचा मिळून तयार झालेला असला पाहिजे. त्यासाठी स्वच्छ पाण्याबरोबरच दररोज खनिजतत्वाचे मिश्रण देऊन आपला आहार परिपूर्ण बनवूया. कोणत्याही प्रकारच्या चाऱ्यातील कोरडा भाग जाणून घेऊन त्यानुसार आहाराचे नियोजन करणे हि शेळीपालन व्यवसायातील महत्वाची गरज बनली आहे ..
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें